बुधवार, २२ जुलै, २०२६

 शिक्षक पालक यांच्यासाठी 


विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती वाढवण्यासाठी ५ प्रभावी आणि नाविन्यपूर्ण उपाय

 १. आनंददायी आणि उपक्रमशील शिक्षण (Activity-Based Learning)

केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी वर्गात खेळ, संगीत, नाटक, डिजिटल तंत्रज्ञान आणि सोपे प्रयोग यांचा वापर करावा. जेव्हा शाळेत काहीतरी नवीन शिकायला आणि करायला मिळते, तेव्हा मुले स्वतःहून उत्साहाने शाळेत येतात.




टीप: आठवड्यातून किमान एक दिवस 'नो बॅग डे' (No Bag Day) ठेवून त्या दिवशी केवळ कला, क्रीडा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत.

२. 'स्टार ऑफ द वीक' आणि डिजिटल हजेरी कार्ड

उपस्थितीसाठी शिक्षेऐवजी प्रोत्साहन देणारी यंत्रणा उभारावी.

  • महिन्यातून किंवा आठवड्यातून १००% उपस्थिती राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे 'स्टार ऑफ द वीक' म्हणून कौतुक करावे.
  • त्यांना छोटी भेटवस्तू (उदा. रंगीत पेन्सिल, शाबासकीचे कार्ड) किंवा वर्गाचा 'कॅप्टन' होण्याची संधी द्यावी. यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही नियमित येण्याची प्रेरणा मिळते.

३. पालक-शिक्षक डिजिटल संवाद आणि व्हॉट्सॲप अलर्ट

अनेकदा पालकांना आपला मुलगा शाळेत पोहोचला आहे की नाही हे माहीत नसते.

  • शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी अनुपस्थित असल्यास 'ऑटोमेटेड एसएमएस' किंवा व्हॉट्सॲप मेसेज पालकांना पाठवण्याची व्यवस्था करावी.
  • पालकांशी केवळ तक्रारींसाठी नव्हे, तर मुलांच्या चांगल्या प्रगतीचे कौतुक करण्यासाठीही संवाद साधावा, ज्यामुळे पालकांचा शाळेवर विश्वास वाढेल.

४. 'मित्र-मैत्रीण' (Buddy System) योजना

मागासलेले किंवा वारंवार गैरहजर राहणारे विद्यार्थी शोधून त्यांचा एक 'बडी' (मित्र/मैत्रीण) बदलावा, जो नियमित शाळेत येतो.

  • नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यावर आपल्या मित्राला/मैत्रिणीला सोबत शाळेत घेऊन येण्याची जबाबदारी द्यावी.
  • यामुळे मुलांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते आणि एकमेकांसाठी का होईना, ती नियमित शाळेत येऊ लागतात.

५. आकर्षक शालेय वातावरण आणि पोषण आहार

शाळेचा परिसर, स्वच्छता आणि तिथली संसाधने आकर्षक असावीत.




  • आकर्षक बोलक्या भिंती: वर्गाच्या भिंतींवर सुंदर आणि शैक्षणिक चित्रे असावीत.
  • गुणवत्तापूर्ण माध्यान्ह भोजन: रोजच्या जेवणात विविधता आणि मुलांच्या आवडीनुसार चवदार, पौष्टिक आहार असावा. स्वच्छ पिण्याचे पाणी आणि मुला-मुलींसाठी वेगळे, स्वच्छ शौचालय या मूलभूत सुविधा हजेरी वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात.

 जेव्हा मुले शाळेला 'ज्ञानाची शाळा' न मानता 'आनंदाचे ठिकाण' मानू लागतील, तेव्हा उपस्थिती वाढवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत!


प्रदीप रवलेकर, कराड 

बुधवार, १ जुलै, २०२६

 निसर्ग आपल्या आवती-भोवती.......उंबर आणि उंबराचे फुल.......

आमच्या शाळेच्या रस्त्याला लागून उंबराचे एक झाड होते. फळांनी नेहमी गच्च भरलेले असायचे. झाडावर फळे खाण्यासाठी पक्षांचा नेहमीच वावर असायचा.... भरपूर पिकून फळे खाली पडायची. आम्ही ती आधी मधी खात असू. उंबराचे फुल बैलगाडीच्या चाकाएवढे असते. ते मध्यरात्री उमलते आणि खूप पुण्यवान माणसालाच दिसते. असे नेहमी मित्रांच्या कडून ऐकायला मिळायचे. आपण पुण्यवान आहोत की नाही हे बघण्यासाठी तर नेहमीच त्या झाडावर नजर जायची. पण फुल कधी दिसले नाही. मुळातच उंबराचे फळ हेच उंबराचे फुल असते हे समजायला बरीच वर्षे गेली.

आज याची आठवण यायला कारण म्हणजे शाळेत उंबराचे झाड लावले. उंबराच्या झाडाबरोबर त्याची ओळख व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच......


पक्षी उंबराची फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो. उंबराचे फळ म्हणजे त्या वनस्पतीचा पुष्पसमूहच असतो. हे फळ कापल्यास ही फुले दिसतात. त्यात नरफुले, मादीफुले आणि नपुंसक (वांझोटी) फुले अशी तीन प्रकारची फुले असतात.
ब्लास्टोफॅगा सेनेस या चिलटा एवढ्या कीटकांची मादी अंडी घालण्यासाठी उंबराच्या खालच्या बाजूने आत प्रवेश करते आणि नपुंसक फुलामध्ये आपली अंडी घालते. ज्या छिद्रातून ती आत शिरते, त्याच्या तोंडाशी आतील बाजूला वाळलेली अनेक ताठ कुसळे असल्याने ती एकदा आत गेली की, तेथून ती बाहेर पडू शकत नाही. ती आतच मरून जाते. यावेळी तिच्या अंगावर दुसऱ्या फुलाकडून येताना माखले गेलेले असंख्य परागकण असतात. ते आतील फुलांवर पडून फळ निर्मिती होते.

काही दिवस गेल्यावर कीटकाच्या अंड्यांतून पिले बाहेर पडतात व वाढतात. त्यांच्या नर-माद्यांचा समागम होऊन नर मरतात. फलित माद्या फळातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. याच वेळी त्यांच्या अंगावर नरफुलातील परागकण माखले जातात. उंबर पिकू लागल्याने वरच्या छिद्राजवळील कुसळे मऊ झालेली असतात. माद्या तेथून सहज बाहेर पडतात आणि अंडी घालण्यासाठी दुसऱ्या कच्च्या उंबराकडे वळतात. अशा प्रकारे हे चक्र चालूच राहते.


ब्लास्टोफॅगा सेनेस हा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्या सहजीवनातून कीटकांचे प्रजनन आणि वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. हे चक्र निरंतर सुरूच राहते.
ही झाडे असणाऱ्या ठिकाणी जमिनीत पाण्याचा साठा आढळतो. शिवाय ही झाडे २४ तास प्राणवायू हवेत सोडतात. सदापर्णी वृक्ष आहे. म्हणून तर अशी झाडे लावायला हवीत, ती वाढवायला हवीत.
(प्रदीप रवलेकर,कराड)