'Freeedu: "एक नवी शैक्षणिक सुरुवात....!"

शनिवार, २० एप्रिल, २०२४

निसर्ग आपल्या आवती भोवती....... धनेश पक्षी

"छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण करून देण्याचं कारण की अशी एक पक्षाची जोडी आहे जी शेवटपर्यत आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाही. ती जोडी म्हणजे धनेश पक्षाची. याला इंग्रजीत Hornbill म्हणतात. नावाप्रमाणेच आकाराने मोठा व शिंगाप्रमाणे चोच असणारा धनेश हा अतिशय सुंदर दिसतो. भारतात एकूण धनेशच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यातील महाराष्ट्रात चार आढळतात.
जानेवारी ते जून हा याचा प्रजननाचा काळ असतो. मादी उंच जुन्या झाडाच्या डोलीत अंडी घालते. अंडी घातल्यानंतर स्वतःला डोलीत 30 ते 45दिवस कोंडून घेते, स्वतःचे मलमूत्र,तोंडातील लाळ व चिखल यांचा वापर करून सगळी डोली लिपुन टाकते. फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवते. हे घरट बांधण्यासाठी नर पक्षी तिला चिखलाचे गोळे चोचीने पुरवतो. मादी डोलीत बंद झाल्यानंतर अन्न पुरवण्याचे काम नर करतो. पिल्लांना पंख फुटे पर्यंत नराला सर्वांच्या अन्नाची जबाबदारी घ्यावी लागते, त्यामुळे नर पुरता दमून जातो.- मादीही कृश होते. पंख फुटल्यावर मादी चोचीने डोली फोडून बाहेर पडते......

बहुतेक ठिकाणी हे पक्षी जोडीनेच फिरताना दिसून येथील....

या पक्षांची एकदा जमलेली जोडी शेवट पर्यंत कायम राहते. ते जीवनभर कायम एकत्रित राहतात. एक मरण पावला की त्याच्या विरहाने काही दिवसात दुसराही मरतो. म्हणूनच छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण होते.

आमच्या लहानपणी गावाकडे राखाडी धनेश अशा मोठ्या संख्येने दिसून यायचे...
मी लहानपणी असले खूप पक्षी गावाकडे पहिले आहेत, लिंबाच्या झाडावर लिंबोळ्या खाण्यासाठी यायचे....आता मात्र ते कुठेच दिसत नाहीत. खूपच दुर्मिळ झाले आहेत.....

(प्रदीप रवलेकर,कराड)

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

 

निसर्ग आपल्या आवती-भोवती पावसाचे गाव.....पाथरपुंज

भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण म्हणून चेरापुंजी ओळखले जाते. अभ्यासाला असल्याने अनेकांना चेरापुंजीची ओळख. परंतु गेल्या काही वर्षीपासून पाटण तालुक्यातील पाथरपुंज या ठिकाणी देशातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आणि अचानक गाव प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रदेशनुसार पावसाचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे ठराविक वर्षीच्या सततच्या पावसाच्या सरासरी प्रमाणावर तेथील पर्जन्यमान निश्चित केले जाते. आज ना उद्या हे ठिकाण जास्त पावसाचे म्हणून नावारूपाला येईल.


या वर्षी ऑगस्ट अखेर चेरापुंजीत ४,७३० मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर पाथरपुंज येथे ५,७८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी देशाच्या हवामान शास्त्रात पाथरपुंज गावाची ओळख निर्माण झाली आहे.
मला पाऊस आवडतो कारण तो माझे डोळ्यातील अश्रू कुणाला दिसून देत नाही म्हणून. पावसात आणि पावसाळ्यात मुक्त भटकणे हा आमचा छंद. त्यातच आपल्या जवळचे ठिकाण म्हणून नेहमी पावसाळ्यात अंबोलीची ट्रीप ठरलेली. व्यावसायीकरण झाल्याने पर्यटकांचा ओढा अंबोलीकडे जास्तच राहिला आहे. म्हणून गेल्या वर्षी वाट वेगळी करून पाथरपुंज गाठले. तसे आम्ही सह्याद्रीतील नेहमीच नव-नवीन ठिकाणे शोधत असतो. त्यातीलच हे पाथरपुंज.

सर्व बाजूनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले पाथरपुंज गाव म्हणजे आदिवासी पाडाच. मळे, कोळणे ही जुळी गावे शेजारी. त्यानंतर १५ ते २० कि.मीच्या परिसरात एकही गाव नाही, फक्त दाटझाडी आणि डोंगर दऱ्या. ना इंटरनेट ना बारमाही वीज. डोंगरातून थेट घरात येणारे झ-यांचे मिनरल water. रस्ता तर फक्त नावालाच. तरीही समृद्ध मानवी जीवन.


या वर्षीचा पाऊस आणि तो ही देशातील सर्वात जास्त पर्जन्य असलेल्या गावात अनुभवता आला. अखंड ढगातून सरळ अंगावर येणाऱ्या पाऊसधारा आणि जवळचे सुद्धा नजरेस पडणार नाही असे दाट धुके. नाचणीची आणि भाताची शेती. सर्वत्र अपार सौंदर्याची खाण असलेला प्रदेश म्हणून डोळ्यात साठवावा तेवढा कमीच. गेल्या वर्षी तर सलग तीन महिने पाऊस होता येथे. त्यातील एक महिना तर आभाळ फाटल्यागत. त्या महिन्यात माणसांना व जनावरांना घराच्या बाहेर सुद्धा पडता आले नाही. घरात जे होते ते खाऊन महिना काढला लोकांनी. चारी बाजूंंनी डोंगर असल्याने आणि सलग महिनाभर धो-धो कोसळणारा पाऊस त्यातच वीज गेलेली अशा वेळी येथील लोकांनी कसा महिना काढला असेल ..? फक्त कल्पनाच केली तरी अंगावर काटा उभा राहतो. मरणप्राय पाऊस अनुभवला इथल्या लोकांनी आणि नेमकी महाराष्ट्रात पूर स्थिती सुरु होती. सगळीकडे पाणीच पाणी........आणि कुणाचा कुणाशी संपर्क नाही.

आज जास्त पाऊस म्हणून या गावांचे नाव होतेय पण, लोकांनी जिवंतपणी मरण अनुभवले आहे. आम्ही पाऊस शोधण्यासाठी तिथपर्यंत पोहचलो तर तेथील लोकांना पाऊस म्हणजे अंगावर भीतीचे शहारे आणणारी काळरात्र वाटते.
सदरची गावे चांदोली व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने त्यांचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्यात आलेले आहे.लवकरच ही तिन्ही गावे उठतील. आणि हा भाग कायमचा दुर्गम होवून जाईल. ना पावसाच्या आठवणी.....ना पाऊस अनुभवण्याची मजा.


(प्रदीप रवलेकर, कराड)

  मुलांच्यासाठी अभ्यास, मस्ती, खेळ व भरपूर वाचनाचा खजिना उपलब्ध मुलांसाठी फ्री वाचन साहित्य उपलब्ध    लिंक वर क्लिक करा आणि पुस्तक वाचनाचा आ...