'Freeedu: "एक नवी शैक्षणिक सुरुवात....!"

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

 मुलांच्यासाठी अभ्यास, मस्ती, खेळ व भरपूर वाचनाचा खजिना उपलब्ध


मुलांसाठी फ्री वाचन साहित्य उपलब्ध  

लिंक वर क्लिक करा आणि पुस्तक वाचनाचा आनंद घ्या. 

इंग्रजी वाचन साहित्य

https://drive.google.com/drive/folders/1by7YnsRoO68E-3uM7xlU6BD53OAE-Uvw

तिसरीपासून पाचवीपर्यंतच्या मुलांच्यासाठी गोष्टी

https://drive.google.com/drive/folders/1P1-0U9T3xertICfgqotgPVwu2zJasFAB

शालेय अभ्यास

https://drive.google.com/drive/folders/1yJRwruranDJAGuBBZAyfSUimtfs411uv

इतर गोष्टी

https://drive.google.com/drive/folders/1B4q-OD4VmRmr77ELsUJ5dZdmEcsP3BNZ



इयत्ता सहावी ते आठवी मधील मुलांच्या साठी खूप सुंदर गोष्टी व संस्कार कथा

https://drive.google.com/drive/folders/1PAj_8-0k81ufXUV6kqh_rzWcoIj_vZvh

चला चित्रे काढूया

https://drive.google.com/drive/folders/1F-W6_0cBMecs5cx7JkzNzJlwLO0VnoQ-


350 हुन  अधिक पुस्तकांचा खजिना, भरपूर चित्र


बुधवार, २२ जुलै, २०२६

 शिक्षक पालक यांच्यासाठी 


विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती वाढवण्यासाठी ५ प्रभावी आणि नाविन्यपूर्ण उपाय

 १. आनंददायी आणि उपक्रमशील शिक्षण (Activity-Based Learning)

केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी वर्गात खेळ, संगीत, नाटक, डिजिटल तंत्रज्ञान आणि सोपे प्रयोग यांचा वापर करावा. जेव्हा शाळेत काहीतरी नवीन शिकायला आणि करायला मिळते, तेव्हा मुले स्वतःहून उत्साहाने शाळेत येतात.




टीप: आठवड्यातून किमान एक दिवस 'नो बॅग डे' (No Bag Day) ठेवून त्या दिवशी केवळ कला, क्रीडा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत.

२. 'स्टार ऑफ द वीक' आणि डिजिटल हजेरी कार्ड

उपस्थितीसाठी शिक्षेऐवजी प्रोत्साहन देणारी यंत्रणा उभारावी.

  • महिन्यातून किंवा आठवड्यातून १००% उपस्थिती राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे 'स्टार ऑफ द वीक' म्हणून कौतुक करावे.
  • त्यांना छोटी भेटवस्तू (उदा. रंगीत पेन्सिल, शाबासकीचे कार्ड) किंवा वर्गाचा 'कॅप्टन' होण्याची संधी द्यावी. यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही नियमित येण्याची प्रेरणा मिळते.

३. पालक-शिक्षक डिजिटल संवाद आणि व्हॉट्सॲप अलर्ट

अनेकदा पालकांना आपला मुलगा शाळेत पोहोचला आहे की नाही हे माहीत नसते.

  • शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी अनुपस्थित असल्यास 'ऑटोमेटेड एसएमएस' किंवा व्हॉट्सॲप मेसेज पालकांना पाठवण्याची व्यवस्था करावी.
  • पालकांशी केवळ तक्रारींसाठी नव्हे, तर मुलांच्या चांगल्या प्रगतीचे कौतुक करण्यासाठीही संवाद साधावा, ज्यामुळे पालकांचा शाळेवर विश्वास वाढेल.

४. 'मित्र-मैत्रीण' (Buddy System) योजना

मागासलेले किंवा वारंवार गैरहजर राहणारे विद्यार्थी शोधून त्यांचा एक 'बडी' (मित्र/मैत्रीण) बदलावा, जो नियमित शाळेत येतो.

  • नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यावर आपल्या मित्राला/मैत्रिणीला सोबत शाळेत घेऊन येण्याची जबाबदारी द्यावी.
  • यामुळे मुलांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते आणि एकमेकांसाठी का होईना, ती नियमित शाळेत येऊ लागतात.

५. आकर्षक शालेय वातावरण आणि पोषण आहार

शाळेचा परिसर, स्वच्छता आणि तिथली संसाधने आकर्षक असावीत.




  • आकर्षक बोलक्या भिंती: वर्गाच्या भिंतींवर सुंदर आणि शैक्षणिक चित्रे असावीत.
  • गुणवत्तापूर्ण माध्यान्ह भोजन: रोजच्या जेवणात विविधता आणि मुलांच्या आवडीनुसार चवदार, पौष्टिक आहार असावा. स्वच्छ पिण्याचे पाणी आणि मुला-मुलींसाठी वेगळे, स्वच्छ शौचालय या मूलभूत सुविधा हजेरी वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात.

 जेव्हा मुले शाळेला 'ज्ञानाची शाळा' न मानता 'आनंदाचे ठिकाण' मानू लागतील, तेव्हा उपस्थिती वाढवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत!


प्रदीप रवलेकर, कराड 

बुधवार, १ जुलै, २०२६

 निसर्ग आपल्या आवती-भोवती.......उंबर आणि उंबराचे फुल.......

आमच्या शाळेच्या रस्त्याला लागून उंबराचे एक झाड होते. फळांनी नेहमी गच्च भरलेले असायचे. झाडावर फळे खाण्यासाठी पक्षांचा नेहमीच वावर असायचा.... भरपूर पिकून फळे खाली पडायची. आम्ही ती आधी मधी खात असू. उंबराचे फुल बैलगाडीच्या चाकाएवढे असते. ते मध्यरात्री उमलते आणि खूप पुण्यवान माणसालाच दिसते. असे नेहमी मित्रांच्या कडून ऐकायला मिळायचे. आपण पुण्यवान आहोत की नाही हे बघण्यासाठी तर नेहमीच त्या झाडावर नजर जायची. पण फुल कधी दिसले नाही. मुळातच उंबराचे फळ हेच उंबराचे फुल असते हे समजायला बरीच वर्षे गेली.

आज याची आठवण यायला कारण म्हणजे शाळेत उंबराचे झाड लावले. उंबराच्या झाडाबरोबर त्याची ओळख व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच......


पक्षी उंबराची फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो. उंबराचे फळ म्हणजे त्या वनस्पतीचा पुष्पसमूहच असतो. हे फळ कापल्यास ही फुले दिसतात. त्यात नरफुले, मादीफुले आणि नपुंसक (वांझोटी) फुले अशी तीन प्रकारची फुले असतात.
ब्लास्टोफॅगा सेनेस या चिलटा एवढ्या कीटकांची मादी अंडी घालण्यासाठी उंबराच्या खालच्या बाजूने आत प्रवेश करते आणि नपुंसक फुलामध्ये आपली अंडी घालते. ज्या छिद्रातून ती आत शिरते, त्याच्या तोंडाशी आतील बाजूला वाळलेली अनेक ताठ कुसळे असल्याने ती एकदा आत गेली की, तेथून ती बाहेर पडू शकत नाही. ती आतच मरून जाते. यावेळी तिच्या अंगावर दुसऱ्या फुलाकडून येताना माखले गेलेले असंख्य परागकण असतात. ते आतील फुलांवर पडून फळ निर्मिती होते.

काही दिवस गेल्यावर कीटकाच्या अंड्यांतून पिले बाहेर पडतात व वाढतात. त्यांच्या नर-माद्यांचा समागम होऊन नर मरतात. फलित माद्या फळातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. याच वेळी त्यांच्या अंगावर नरफुलातील परागकण माखले जातात. उंबर पिकू लागल्याने वरच्या छिद्राजवळील कुसळे मऊ झालेली असतात. माद्या तेथून सहज बाहेर पडतात आणि अंडी घालण्यासाठी दुसऱ्या कच्च्या उंबराकडे वळतात. अशा प्रकारे हे चक्र चालूच राहते.


ब्लास्टोफॅगा सेनेस हा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्या सहजीवनातून कीटकांचे प्रजनन आणि वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. हे चक्र निरंतर सुरूच राहते.
ही झाडे असणाऱ्या ठिकाणी जमिनीत पाण्याचा साठा आढळतो. शिवाय ही झाडे २४ तास प्राणवायू हवेत सोडतात. सदापर्णी वृक्ष आहे. म्हणून तर अशी झाडे लावायला हवीत, ती वाढवायला हवीत.
(प्रदीप रवलेकर,कराड)

शुक्रवार, १९ जून, २०२६

 

निसर्ग आपल्या आवती भवती.......पैसा किडा / वाणी किडा

पैसा किडा त्यालाच वाणी किडा (Millipede) म्हणून आपण ओळखतो. पावसाळ्यात दिसणारे हे किडे इतर वेळी जातात कुठे ? खातात काय? आणि हे नेमके पावसाळ्यातच कुठून येतात. असे अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांचा वेध....
पावसाळ्यात हे आपल्या परिसरात बागेत शाळेभोवती हमखास आढळून येतात......

पैसा किडा एक ते दोन वर्ष जगतो. मादी सुमारे 150 ते 200 अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सर्व पिल्ले एकत्रित प्रवासाला निघतात. एकत्रित जण्याने शत्रूला एवढा मोठ्ठा कसला प्राणी म्हणून सहज चकवा देता येतो. त्यामुळे त्यांना काठीने विसकटले तरी ते पुन्हा पुन्हा एकत्रित येतात. 20 ते 21 दिवस एकत्रित राहिल्यानंतर हे सर्व किडे आपआपल्या मार्गाने इतरत्र पसरतात. कुजलेला पाला-पाचोळा व बारीक बारीक वनस्पतीची लव हे त्यांचे अन्न. हे निरुपद्रवी असल्याने सहसा कोणी त्यांना मारत नाही.


हे किडे सुरवातीच्या काळात एकत्रित राहून मार्गक्रमण करत असतात.....

मात्र काही पक्षी, कीटक त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यामुळे सुरवातीला एवढ्या मोठ्या संख्येने दिसणारे मोठ्ठे झाल्यावर खूपच कमी दिसून येतात. संकट येताच शत्रू पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शरीराची गुंडाळी करून घेतात. त्यांचा हा आकार पैश्या सारखा असल्याने त्याला पैसा किडा म्हणून ओळखतात.
विशिष्ठ प्रकारचा वास सोडून शत्रूपासून बचाव करण्याची नैसर्गिक देणगी त्यांना मिळालेली असते. हे किडे आकाराने मोठ्ठे झाल्यावर त्यांच्या अंगावरचे कवच कठीण व चमदार बनते. जे काही जिवंत राहतात. ते अंडी घालून पुढचा वंश अबाधित ठेवतात. त्यामुळे ते पुढच्या पावसाळ्यातच दृष्टीस पडतात यांना 60 ते 70 पायांच्या जोड्या असतात. कोरडवाहु शेती असणार्या भागात यांचे प्रमाण जास्त असते.

शरीराची गुंडाळी करण्याच्या त्याच्या पद्तीमुळे त्याला पैसा किडा म्हणून आम्हाला त्याची पहिली ओळख झाली

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा घरातील मोटठी माणसं सांगायची या कीड्याचे पैसे होतात म्हणून. मग आम्ही त्यांना मारून पुरून ठेवेत असू. ढीगभर किडे पुरूनही चिमुटभर पैसा मिळाला नाही. त्यामुळे आज त्यांना मारलेल्याचे दुख आहेच. आणि याच कुतुहलातून अनेक ठिकाणावरून जमा केलेली माहिती आपल्यासाठी. या महितीसाठी कराडचे प्रसिद्ध प्राणी शास्त्रज्ञ डॉ. एस एस पाटील यांची मदत झाली...
(प्रदीप रवलेकर, कराड

गुरुवार, १९ मार्च, २०२६

                           

                               भिंतीबाहेरची शाळा....

                 
                          पक्षांसाठी पाणी व चारा देऊन निसर्गाशी नाते जोडण्याचे प्रयत्न ........

         भिंतीबाहेरची शाळा....

               वृक्षतोड व जंगलाची मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने प्राणी- पक्षांचे अधिवास कमी होत आहेत. याचा एकूणच त्यांच्या जीवनावर परिणाम होऊन त्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येते. म्हणून आम्ही दरवर्षी पक्षासाठी घरटी तयार करणे, अन्न व पाण्याची सोय करणे. मोकळ्या जागेत बिया पुरणे, आणि त्या परिसराची स्वच्छता हे उपक्रम गेल्या तीन वर्षापासून राबवित आहोत.

 

                 

             प्रामुख्याने शाळा बालसुधारगृह (मलकापुर) व आगाशिव डोंगर (जखिणवाडी) परिसर हे आमचे कार्यक्षेत्र. प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून पाणी साठवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठीची भांडी तयार केली जातात. नारळाच्या कवट्या, पोकळ बांबूचे अर्धे तुकडे, प्लास्टिकचे कॅन यांचा उपयोग केला जातो. गेल्या वर्षी तब्बल 9 पोती प्लॅस्टिक आगाशिव डोंगराच्या पायथ्यापासून गोळा झाले होते. वर्षभरातील मुलांनी खाल्लेल्या फळातील बियांचे झालेले संकलन मोकळ्या माळा पर्यंत येवून पोहचते. आणि एक एक बी मातीचा आसरा घेते. तेव्हाच मुलांची मातीशी असणारी नाळ जोडली जाते. आणि शिक्षण म्हणजे तरी दुसरे तिसरे काय...? 

 

                 
                        आगाशिव लेण्यांच्या पायथ्याला दरवर्षी कचरा निर्मुलन उपक्रम 

                            चार भिंतीच्या आतील शिक्षण चार भिंतीच्या बाहेर आणून परिसर आणि मुलांच्या   जगण्याशी त्याची सांगड घालण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. प्रयत्न लहान, मुले ही  लहान पण परिसराशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करून त्याकडे मुलांच्या पाहण्याचा दृष्टीकोण सकारात्मक बनविणे हे स्वप्न मोठ्ठे. कारण आम्हाला माहिती आहे,
 स्वप्नातून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तीत्वात आहे. फक्त हवी ती जिद्द आणि चिकाटी।

                                  (प्रदीप रवलेकर, कराड)

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

 प्रवास वर्णन 

नाणेघाट....प्राचीन व्यापारी मार्ग...

महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या नाणेघाटाला पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. या वर्षी सह्याद्रीतील काही घाट नजरेत घ्यायचे म्हणून नाणेघाट चा प्लॅन केला. या सुंदर ठिकाणाची तुम्हालाही सैर घडावी म्हणून हा लेखन प्रपंच.

पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. पूर्वीच्या प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या भडोच, सोपारा,कल्याण व चेऊल या बंदरांत येत असे. या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीमार्गे देशावर होत होती. याशिवाय पठारावरील लोक देशावरून कोकणात ये-जा करण्यासाठी या घाट रस्त्याचा उपयोग करीत असत. त्याकाळी सोपारा व कल्याण येथून पठारावर माल वहातुक करण्यास नाणेघाट जवळचा व सोयीचा मार्ग होता. नाणेघाटापासून पुढे हा मार्ग देशावर जुन्नर-नगर-नेवासा-पैठण असा होता.

घाटमाथ्यावर पठार असून तेथे एक भव्य कोरीव दगडी रांजण आहे. या रांजणात पूर्वी जकातीची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती तेथील एका स्थानिकाने सांगितली.
नाणेघाट येथील खिंडमार्गातील मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या मूर्ती कोरलेल्या आढळून येतात. भग्न झालेल्या मूर्तीच्या बाजूला त्यांची नावे कोरलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या यज्ञांचा व दानांचा शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे. त्यातील बरीचशी अक्षरे नष्ट झालेली दिसून आली.
प्राचीन काळातील खडतर मार्ग म्हणून आज हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. बाजूला उलटे धबधबे आहेत. ते हि पाहण्यासारखे आहेतच. शिवाय खिंडमार्गाजवळील नानीचा अंगठा निसर्गाचा आस्वाद घेण्यासारखा पाँईट आहे. जवळच जीवधन किल्ला आहे.


मार्ग- कराड- सातारा-पुणे-चाकण-मंचर-नारायणगाव-जुन्नर-नाणेघाट 285 कि.मी. एकेरी



प्रदीप रवलेकर, कराड

मंगळवार, २० मे, २०२५

निसर्ग आपल्या आवती भोवती- काजवे  

काजव्यांच्या दुनियेत......

चार-दोन आम्रसरीचे पाऊस झाल्यानंतर हवेमधील उष्णतेची जागा गारवारा घेतो. तेव्हा पावसाळा तोंडावर आला असल्याची जाणीव होते, आणि पाऊले सह्याद्रीच्या वाटा-आडवाटात काजव्यांची झाडे शोधण्यासाठी आंब्याच्या दिशेने वळतात.

नीरव शांतता.... गार वारा.... मिट्ट काळोख..... आणि समोर चमचमणारी काजव्याची झाडे. ...... हे सुंदर दृश्य पाहिल्यानंतर आकाशातील तारांगण पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. मान्सून पूर्व काळ हा काजव्यांच्या प्रणयाराधनेचा काळ.... या कलावधीत लाखोंच्या संख्येने काजवे जवळ पास पाणी असणार्याय झाडावर गोळा होतात. मादी काजव्याच्या तुलनेत नर काजवे जास्त चमकतात. आपल्या प्रकाशाच्या साह्याने ते मादी काजव्याना आकर्षित करीत असतात.

जगभर काजव्यांचा 2000 च्या वर जाती आढळतात. अंडी, अळी व काजवा असे त्याचे जीवनमान. पंख फुटल्यानंतर 10 ते 15 दिवसाचे आयुष्य. मिलना नंतर नर काजवे लगेच मारून जातात तर मादी मातीत वरच्या वर अंडी घालून मरते. अनेक काजवे जोराचा पाऊस किंवा इतर पक्षांची शिकार होतात. सर्व काजवयांची अंडी प्रकाश देत नाहीत मात्र सह्याद्रीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या काही काजव्यांची अंडी, अळी व काजवे प्रकाश देतात.


ल्युसिफेरेज नावाच्या रसायनाचा ऑक्सिजनशी संयोग झाला की काजव्यातून प्रकाश उत्सर्जित होतो. हा प्रकाश थंड असतो. त्यामुळे पिवळा दिसतो. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर काजव्याची अळी प्रामुख्याने मृदू कवच असणाऱ्या गोगलगायी वर तुटून पडतात. हेच त्यांचं मुख्य खाद्य. अळीला पुढे दोन अंटिना व एकदम संवेदनशील स्पर्शिका असतात. त्यामुळे त्यांना त्यांचे भक्ष लवकर पकडता येते. अंडी ते अळी हा खूप मोठ्ठा कालावधी असतो. अळी खूप खावून घेते. पुढे हीच चरबी त्यांना शेवटच्या 10 ते 15 दिवसासाठी वापरता येते.
समागम काळात बहुतेक काजवे काही खात नाहीत. काही मादी काजवे इतर जातीच्या काजव्याना आकर्षित करून खावून टाकतात. मादी काजवे शक्यतो जागा सोडत नाहीत. आपल्या छोट्या प्रकाशाने नर काजव्याना सिग्नल देतात. त्यांचा हा खेळ रात्री उशिरा पर्यंत चाललेला असतो. काजव्याची छोटी दुनिया पण नक्कीच वेड लावणारी आहे. गेले चार पाच वर्षे झाली हा अनुभव मी घेतोय. या वर्षी तुम्ही नक्कीच घ्या........... अलिकडे काजवा महोत्सव भरवून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.
(प्रदीप रवलेकर, कराड)

गुरुवार, १५ मे, २०२५

 

निसर्ग आपल्या आवती-भोवती 

घोस्ट ट्री/ भुतियाचे झाड


पानझडी वनात प्रमुख्याने ही झाडे आढळून येतात. आंबा घाट उतरून गणपती पुळ्याला जाताना दाभोळ सोडले की, घाट चढताना घाटातच उजव्या बाजूला एक मोठ्ठे झाड आहे. उन्हाळ्यात आवर्जून त्याकडे लक्ष जातेच. पानझडी वनात ही झाडे मुबलक प्रमाणात आढळून येतात. ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पाने गळून पडायला सुरुवात होते तर मे, जून महिन्यापासून नवी पालवी फुटते. जेव्हा या झाडांची पाने गळून पडत असतात, त्याचवेळी झाडाच्या खोडावरील पातळ साल (छिलके) निघून जात असतात. त्यामुळे झाडांचा रंग एकदम पांढरा होऊ लागतो. तो एव्हढा पांढरा होतो की, जणू कुणी ती झाडे रंगवली असावीत असे वाटते. अशी पर्णहीन पांढरी फेक झाडे जंगलात इतर झाडापेक्षा खूपच लक्ष वेधून घेतात.

बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण झाडे पांढरी होत असल्याने वनात एखादी नग्न तरुणी उभी असल्याचा भास निर्माण होतो. म्हणून तर या झाडांचा उल्लेख The nude young lady in a forest (द न्यूड यंग लेडी इन फॉरेस्ट) असा आढळून येतो.

या झाडांना नर, मादी व उभयान्वयी अशा तिन्ही प्रकारची फुले येतात. फुलांचा उपयोग कामोत्तेजना वाढवण्यासाठी तर फळांच्या बियांचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. पावसाळ्यात ही झाडे तर झाडाप्रमाणे दिसतात. वेगळेपण लक्षात येत नाही. उन्हाळ्यात मात्र त्यांचे हे उघडे सौंदर्य लक्षात राहण्यासारखेच असते.....



(प्रदीप रवलेकर, कराड,)

रविवार, २१ जुलै, २०२४

 प्रवास वर्णन 

सांधण व्हॅली- निसर्गाचा अदभूत चमत्कार

पावसाळ्यातील ट्रेक मध्ये प्रामुख्याने गड किल्ले यांची भटकंती ठरलेली. या वेळी थोडी वेगळी वाट करून अहमदनगर जिल्ह्यांतील साम्रद गाव गाठले. गाव म्हणजे कसले अजूनही एखादा आदिवासी पाडाच. सह्याद्रीच्या खुशीत बसलेले हे गाव नजीकच्या सांधण दरीमुळे जगाच्या नकाशावर आलेले. भूगर्भातील हालचालीमुळे येथील पठाराला भेग पडली आहे. हीच सांधण व्हॅली. आशिया खंडातील दोन नंबरची सर्वात खोल दरी म्हणून ओळखली जाते. हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येथे येत असतात. मात्र मला हे ठिकाण पाहण्यासाठी २०२१ सालाची वाट पहावी लागली.

श्रावण महिना नसला तरी सद्या वातावरण खूप आल्हाददायक आहे. याच संधीचा फायदा घेवून सांधण व्हॅलीच्या दर्शनाला आम्ही बाहेर पडलो. दुपारी एक दीड वाजता या ठिकाणी पोहचलो. पावसाळा असूनही उन्हाचा तडाका जाणवत होता. दहा ते पंधरा मिनीटांचे अंतर चालून काही पॉईंट बघून घेतले. येथील निसर्गाचे अद्भुतरम्य रूप पाहण्यासारखे आहे.

उलटे धबधबे व खोल सरळ रेषेतील सह्याद्रीचे कडे डोळ्याचे पारणे फेडतात. जवळच असलेली सांधण व्हॅली वरून पाहताना काळजाचा ठोका चुकतोय की काय? अशी क्षणभर भीती मनात येवून जातेच. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पावसाळ्यात बंद असल्याने दरीतून प्रवास करता आला नाही. मात्र काही अंतरापर्यंत गार्डच्या मदतीने जाता आले. रॅप्लिंग काही अंशी चालू होते. मनसोक्त फोटो सेशन सुरु असताना उन्हाने पूर्णपणे अंगाची लाही लाही झाली होती, परंतु दरीतील थंड पाण्याने थकवा कुठे निघून गेला ते समजलेच नाही. दरीतील थंड वातावरण मनाला ताजे करून गेले. भर दुपारी दरीतील काळोख अनुभवता आला.


सुमारे दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेल्या या दरीतील अनेक धबधबे नजरेत साठवून आम्ही परतीचा मार्ग धरला. रस्त्यातील हॉटेलमध्ये घरगुती जेवण करून भंडारदरा रस्ता धरला. बरोबर नेहमीचीच पत्रकारांची टीम होतीच.
कराड- पुणे- चाकण- राजगुरूनगर- मंचर- नारायणगाव- कोतूळ- भांडारदरा- उडदावणे-साम्रद..350 कि.मी एकेरी
प्रदीप रवलेकर, कराड

शनिवार, २० एप्रिल, २०२४

निसर्ग आपल्या आवती भोवती....... धनेश पक्षी

"छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण करून देण्याचं कारण की अशी एक पक्षाची जोडी आहे जी शेवटपर्यत आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाही. ती जोडी म्हणजे धनेश पक्षाची. याला इंग्रजीत Hornbill म्हणतात. नावाप्रमाणेच आकाराने मोठा व शिंगाप्रमाणे चोच असणारा धनेश हा अतिशय सुंदर दिसतो. भारतात एकूण धनेशच्या नऊ प्रजाती आढळतात. त्यातील महाराष्ट्रात चार आढळतात.
जानेवारी ते जून हा याचा प्रजननाचा काळ असतो. मादी उंच जुन्या झाडाच्या डोलीत अंडी घालते. अंडी घातल्यानंतर स्वतःला डोलीत 30 ते 45दिवस कोंडून घेते, स्वतःचे मलमूत्र,तोंडातील लाळ व चिखल यांचा वापर करून सगळी डोली लिपुन टाकते. फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवते. हे घरट बांधण्यासाठी नर पक्षी तिला चिखलाचे गोळे चोचीने पुरवतो. मादी डोलीत बंद झाल्यानंतर अन्न पुरवण्याचे काम नर करतो. पिल्लांना पंख फुटे पर्यंत नराला सर्वांच्या अन्नाची जबाबदारी घ्यावी लागते, त्यामुळे नर पुरता दमून जातो.- मादीही कृश होते. पंख फुटल्यावर मादी चोचीने डोली फोडून बाहेर पडते......

बहुतेक ठिकाणी हे पक्षी जोडीनेच फिरताना दिसून येथील....

या पक्षांची एकदा जमलेली जोडी शेवट पर्यंत कायम राहते. ते जीवनभर कायम एकत्रित राहतात. एक मरण पावला की त्याच्या विरहाने काही दिवसात दुसराही मरतो. म्हणूनच छोडेंगे ना हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक.." या गाण्याची आठवण होते.

आमच्या लहानपणी गावाकडे राखाडी धनेश अशा मोठ्या संख्येने दिसून यायचे...
मी लहानपणी असले खूप पक्षी गावाकडे पहिले आहेत, लिंबाच्या झाडावर लिंबोळ्या खाण्यासाठी यायचे....आता मात्र ते कुठेच दिसत नाहीत. खूपच दुर्मिळ झाले आहेत.....

(प्रदीप रवलेकर,कराड)

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

 

निसर्ग आपल्या आवती-भोवती पावसाचे गाव.....पाथरपुंज

भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण म्हणून चेरापुंजी ओळखले जाते. अभ्यासाला असल्याने अनेकांना चेरापुंजीची ओळख. परंतु गेल्या काही वर्षीपासून पाटण तालुक्यातील पाथरपुंज या ठिकाणी देशातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आणि अचानक गाव प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रदेशनुसार पावसाचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे ठराविक वर्षीच्या सततच्या पावसाच्या सरासरी प्रमाणावर तेथील पर्जन्यमान निश्चित केले जाते. आज ना उद्या हे ठिकाण जास्त पावसाचे म्हणून नावारूपाला येईल.


या वर्षी ऑगस्ट अखेर चेरापुंजीत ४,७३० मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर पाथरपुंज येथे ५,७८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी देशाच्या हवामान शास्त्रात पाथरपुंज गावाची ओळख निर्माण झाली आहे.
मला पाऊस आवडतो कारण तो माझे डोळ्यातील अश्रू कुणाला दिसून देत नाही म्हणून. पावसात आणि पावसाळ्यात मुक्त भटकणे हा आमचा छंद. त्यातच आपल्या जवळचे ठिकाण म्हणून नेहमी पावसाळ्यात अंबोलीची ट्रीप ठरलेली. व्यावसायीकरण झाल्याने पर्यटकांचा ओढा अंबोलीकडे जास्तच राहिला आहे. म्हणून गेल्या वर्षी वाट वेगळी करून पाथरपुंज गाठले. तसे आम्ही सह्याद्रीतील नेहमीच नव-नवीन ठिकाणे शोधत असतो. त्यातीलच हे पाथरपुंज.

सर्व बाजूनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले पाथरपुंज गाव म्हणजे आदिवासी पाडाच. मळे, कोळणे ही जुळी गावे शेजारी. त्यानंतर १५ ते २० कि.मीच्या परिसरात एकही गाव नाही, फक्त दाटझाडी आणि डोंगर दऱ्या. ना इंटरनेट ना बारमाही वीज. डोंगरातून थेट घरात येणारे झ-यांचे मिनरल water. रस्ता तर फक्त नावालाच. तरीही समृद्ध मानवी जीवन.


या वर्षीचा पाऊस आणि तो ही देशातील सर्वात जास्त पर्जन्य असलेल्या गावात अनुभवता आला. अखंड ढगातून सरळ अंगावर येणाऱ्या पाऊसधारा आणि जवळचे सुद्धा नजरेस पडणार नाही असे दाट धुके. नाचणीची आणि भाताची शेती. सर्वत्र अपार सौंदर्याची खाण असलेला प्रदेश म्हणून डोळ्यात साठवावा तेवढा कमीच. गेल्या वर्षी तर सलग तीन महिने पाऊस होता येथे. त्यातील एक महिना तर आभाळ फाटल्यागत. त्या महिन्यात माणसांना व जनावरांना घराच्या बाहेर सुद्धा पडता आले नाही. घरात जे होते ते खाऊन महिना काढला लोकांनी. चारी बाजूंंनी डोंगर असल्याने आणि सलग महिनाभर धो-धो कोसळणारा पाऊस त्यातच वीज गेलेली अशा वेळी येथील लोकांनी कसा महिना काढला असेल ..? फक्त कल्पनाच केली तरी अंगावर काटा उभा राहतो. मरणप्राय पाऊस अनुभवला इथल्या लोकांनी आणि नेमकी महाराष्ट्रात पूर स्थिती सुरु होती. सगळीकडे पाणीच पाणी........आणि कुणाचा कुणाशी संपर्क नाही.

आज जास्त पाऊस म्हणून या गावांचे नाव होतेय पण, लोकांनी जिवंतपणी मरण अनुभवले आहे. आम्ही पाऊस शोधण्यासाठी तिथपर्यंत पोहचलो तर तेथील लोकांना पाऊस म्हणजे अंगावर भीतीचे शहारे आणणारी काळरात्र वाटते.
सदरची गावे चांदोली व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने त्यांचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्यात आलेले आहे.लवकरच ही तिन्ही गावे उठतील. आणि हा भाग कायमचा दुर्गम होवून जाईल. ना पावसाच्या आठवणी.....ना पाऊस अनुभवण्याची मजा.


(प्रदीप रवलेकर, कराड)

  मुलांच्यासाठी अभ्यास, मस्ती, खेळ व भरपूर वाचनाचा खजिना उपलब्ध मुलांसाठी फ्री वाचन साहित्य उपलब्ध    लिंक वर क्लिक करा आणि पुस्तक वाचनाचा आ...